उरुळी कांचन येथे बँकेसमोरून लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद, परिसरातील चोऱ्यांचे सत्र सुरुच
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या उरुळी कांचन परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि.१७ जुलै) रोजी बँकेसमोर पार्किंग करून ठेवलेली हिरो होंडा पॅशन (क्र. MH 12 JW 4725) ही सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान चोरी गेली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मोटारसायकल चोरी करणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनमालकाने मोटारसायकल बँकेसमोर पार्क करून कामासाठी गेल्यानंतर काही वेळाने परत येताच वाहन जागेवर नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता एक संशयित व्यक्ती मोटारसायकलचे चावी लॉक ला छेडछाड करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताने मोटारसायकल सुरू केल्यानंतर काही क्षणांतच गाडी आणि संशयित दोघेही फुटेजमधून अचानक गायब झाल्याचे दिसत असल्याने स्थानिकांकडून सीसीटीव्ही प्रणालीमध्ये छेडछाड किंवा तांत्रिक बिघाड झाला असावा, कि सीसीटीव्ही हॅक केला असावा? अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
दरम्यान, उरुळी कांचन परिसरात यापूर्वीही ट्रक आणि हायवा डंपरच्या बॅटऱ्या चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. म्हातोबा–आळंदी रोडवरील मगर वस्ती येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या हायवा ट्रक (क्र. MH 12 XM 9241) मधील दोन बॅटऱ्या चोरीला गेल्याची माहिती वाहनमालक बापू जवळकर यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांत अनेक ट्रक व हायवा वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या असून त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले आहे. तसेच रविवार (ता. १२ जुलै) रोजी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान झेड प्लस हॉस्पिटल समोरून होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र. (MH 42 AM 4062) ही भरदिवसा चोरी गेली. चोर स्पष्ट सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
याशिवाय, नुकत्याच उरुळी कांचन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे सिग्नलच्या वायर कापून एक्सप्रेस रेल्वे थांबवून लुटीचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेत एका महिला प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता. रेल्वे पोलिस आणि उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला होता.
मोटारसायकल चोरी, ट्रक बॅटरी चोरी आणि रेल्वे परिसरातील गुन्ह्यांच्या सलग घटनांमुळे उरुळी कांचन परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. रात्रीची पोलीस गस्त वाढविणे, संशयितांवर कठोर कारवाई करणे तसेच सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
























