पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरांचा धुमाकूळ; उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या जवळच चोरी ; ट्रक, हायवाच्या बॅटऱ्या होत आहेत लक्ष्य
✍️ नितीन करडे
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरांचा धुमाकूळ; उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या जवळच झालेल्या चोरीमुळे पोलिसांचा धाक चोरांना उरला नाही का? नागरिकांमध्ये संताप
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, बॅटरी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे ट्रक, हायवा, आयशर तसेच जनरेटरच्या महागड्या बॅटऱ्या लंपास करत असल्याने वाहनचालक, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या अगदी शेजारी फक्त मधे हॉटेल असलेल्या पेट्रोल पंपावरूनच बॅटरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार (ता.14 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस स्टेशन जवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या हायवा ट्रक क्रमांक (MH-12 YB-8602) च्या दोन बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या दरम्यान एक चोरटा वाहनाजवळ येऊन बॅटऱ्या मोटर सायकलवर नेत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ चोरी झाल्याने “चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
“बॅटरी चोरून नेत असताना सीसीटीव्ही मध्ये चोर कैद”
इनामदार वस्ती येथील यशोदा कार्यालयाच्या जनरेटरच्या बॅटऱ्या मागील दोन महिन्यांत दोन वेळा चोरीला गेल्याची माहिती कार्यालयाचे मालक अमोल भोसले यांनी दिली. तसेच गेल्या महिन्यात यशोदा कार्यालय पार्किंगमधे आयशर ट्रक क्रमांक (MH-12 YQ-4414) ची देखील बॅटरी चोरीला गेली होती. तसेच चिंतामणी हॉस्पिटलच्या शेजारी पार्किंग केलेल्या दोन आयशर ट्रक क्र. 1} (MH12- TV-9050)— 2} (MH12- TV- 9040) या दोन ट्रकच्या बॅटऱ्या (ता. 18 जून रोजी) चोरी गेली असल्याचे ओंकार शिंदे यांनी सागितले.
” पुणे-सोलापूर महामार्गावर बॅटरी चोरीचे सत्र सुरूच “
पुणे-सोलापूर महामार्गालगत पार्किंग केलेल्या जड वाहनांना चोरटे सातत्याने लक्ष्य करत आहेत. ट्रक, हायवा आणि इतर वाहनांच्या बॅटऱ्या चोरी जाण्याच्या घटना वाढल्या असून, वाहनमालकांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
” रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी “
महामार्गालगत रात्रीच्या वेळी होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये नाराजी असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर कारवाई करावी आणि बॅटरी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महामार्गालगत वारंवार चोरीच्या घटना घडत असतील तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आता उरुळी कांचन पोलीस या बॅटरी चोरट्यांना कधी जेरबंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























