वारीदरम्यान अपघातग्रस्त वारकरी भगिनीला तात्काळ आर्थिक व वैद्यकीय मदत द्यावी – आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके यांची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी
✍️ नितीन करडे
पुणे : आषाढी वारीदरम्यान जेजुरी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या वारकरी सौ. विमल गोते यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत तसेच मोफत व योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ता.१३ जुलै २०२६ रोजी पहाटे जेजुरी येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची दिंडी मार्गस्थ असताना भरधाव पिकअप वाहनाने वारकऱ्यांना धडक दिली. या अपघातात वारकरी सौ. विमल गोते या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर अनेक सामाजिक संस्था व भाविकांनी मदतीचा हात पुढे केला असला तरी शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक अथवा वैद्यकीय मदत मिळालेली नसल्याने गोते कुटुंबावर मोठा आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण झाला आहे. उपचारांचा वाढता खर्च आणि कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे आमदार कटके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
याची गंभीर दखल घेत आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना पत्र पाठवून संबंधित प्रशासनाला त्वरित आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे. जखमी वारकरी भगिनीला मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा शासनाच्या इतर उपलब्ध योजनांमधून आर्थिक मदत मंजूर करावी, तसेच उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले. अशा दुर्घटनांमध्ये बाधित वारकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी कायमस्वरूपी मदत यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आमदार कटके यांनी संबंधित वारकरी भगिनीच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला असून शासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.























