समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर
✍️ नितीन करडे
पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या व्यवसाय, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतो. मात्र, आपल्या जन्मभूमीशी, परिसराशी आणि समाजाशी असलेली नाळ कायम जपत एकत्र येऊन समाजोपयोगी कार्य करण्याची भावना जपणे ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर यांनी केले.
“पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ च्या बॅचकडून वृद्धाश्रमाला आरओ वॉटर फिल्टरची भेट”
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थी-माजी विद्यार्थिनींच्या वतीने कवडीपाट (कदमवाकवस्ती) येथील ‘समर्पण वृद्धाश्रम’मध्ये बसविण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या (आरओ वॉटर फिल्टर प्लांट) लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हभप सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. राहुल झेंडे, ‘समर्पण’चे कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, सखाराम घाडगे, डॉ. लक्ष्मण मासाळ, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बापू काळभोर यांच्यासह १९८६ च्या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमोद रासकर म्हणाले, “आजचा हा सोहळा केवळ एका जलशुद्धीकरण यंत्रणेच्या लोकार्पणापुरता मर्यादित नसून, तो कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांचा उत्सव आहे. पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ च्या बॅचने हाती घेतलेला हा उपक्रम समाधान आणि आनंद देणारा आहे. ‘पाणी हेच जीवन’ असे आपण नेहमी म्हणतो, परंतु शुद्ध पाणी हे निरोगी जीवनासाठी अधिक महत्त्वाचे आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामागील भावना अत्यंत पवित्र असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही एका अर्थाने ईश्वरसेवाच केली आहे. या उपक्रमातून तरुण पिढीला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.”
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र (बापू) काळभोर, ज्येष्ठ शिक्षिका कल्पना बोरकर, सूर्यकांत गवळी आणि डॉ. लक्ष्मण मासाळ यांनीही मनोगत व्यक्त करून समाजासाठी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र (बापू ) काळभोर यांनी केले, तर सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
























