उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील नव्या चौकात दोन वेगवेगळे अपघात
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघाताची मालिका सुरू….
✍️ नितीन करडे
पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नवीन वळण घेण्याच्या ठिकाणी दिवसात दोन अपघात झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसरात तीन वळण घेण्यासाठी नवीन चौक बनवण्यात आले आहे. पण तीन चौकात वाहनाची गती कमी होण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना नसल्याने व काम अर्धवट असल्याने नवीन वळण्याच्या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघाताची मालीका सुरुच आहे. त्यात आज (ता. २० ऑगस्ट) बुधवार रोजी सायंकाळी तीन वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील चौकात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार ट्रक व एक मोटारसायकल चा समावेश असुन यात मोटारसायकल चालक किरकोळ जखमी झाला आहे. उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील चौकात कार वळून घेत असताना तीन ट्रक थांबल्या होत्या. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या कचराच्या ट्रकचा थांबलेल्या ट्रकला मागून येऊन जोरदार धडक दिली आहे. यात थांबलेल्या तीन ट्रक एकमेकांना धडकल्या. व कचऱ्याच्या ट्रकला मागून येणारी मोटर सायकल चालकाची धडक बसली. तसेच काही वेळातच पुन्हा त्याच परिसरात दोन शाळकरी विद्यार्थी सायकल घेऊन महामार्ग ओलांडत असताना विद्यार्थ्यांना एका मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात दोन्ही विद्यार्थी भर रस्त्यावर पडले असुन विद्यार्थी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती प्रथमदर्शनी सांगितले. सुदैवाने दोन्ही अपघातात जीवितहानी टळली आहे.या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी योग्य नियोजन, सिग्नल व्यवस्था तसेच पोलिस बंदोबस्ताची तातडीने गरज असल्याचे मत ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करत आहेत. अन्यथा पुढील काळात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नवीन चौक सुरू झाल्यानंतर चौकातील गोंधळामुळे सतत अपघातांची मालिका सुरू असल्याची स्थानिकांची तक्रार केली आहे.

महामार्गावरील वळण घेण्याच्या ठिकाणी प्रशासनाने त्वरित वाहनांची गती कमी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच या चौकात सिग्नल व्यवस्था, तसेच तातडीने पोलिस नेमण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करत आहेत. अन्यथा पुढील काळात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
………………























