उरुळी कांचनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात; विविध ठिकाणी कार्यक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात,भक्तिभावाने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत साजरी करण्यात आली.दत्तवाडी, सटवाई चौक,उरुळी कांचन पोलीस स्टेशन तसेच महावितरण कार्यालय, उरुळी कांचन ग्रामपंचायत, येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलाकडूनही मोठ्या आदराने जयंती साजरी करण्यात आली.
सर्व ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत “ज्ञान, समता आणि बंधुता” या त्यांच्या विचारांचा जागर केला. जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. या जयंती सोहळ्यात युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. “जयभीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सांस्कृतिक कार्यक्रम, गीते आणि भाषणांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यात आला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन करत सर्व व्यवस्था सुरळीत पार पाडली.
या कार्यक्रमाला समाजसेवक अनिल कदम, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्याचे महासचिव सतीश साळवे, काका गाडे, मुकेश बडेकर, संदीप बडेकर, मल्हारी बडेकर, निवृत्त पोलीस अधिकारी कदम तसेच अनेक मान्यवर ग्रामस्थांनी सहभाग घेतला. तसेच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पो. हवा सलीम शेख, शैलेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल काजल सानप आणि महिला होमगार्ड पीटे यांनी कार्यक्रमादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.
उरुळी कांचनमध्ये पार पडलेला हा जयंती सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाजप्रबोधन, एकता आणि प्रेरणेचा संदेश देणारा ठरला.


























