उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!
पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पांगारे वस्ती येथे एका घराला चोरट्यांनी मध्यरात्री लक्ष्य करत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना शनिवार, (ता. ८ ऑगस्ट ) रोजी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर रस्त्यावरून जात असताना हातात धारदार कोयता घेऊन जाणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
पांगारे वस्ती, उरुळी कांचन येथील दिपक संतोष गावडे (वय २६) यांच्या राहत्या घराचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील अंदाजे तीन तोळे दोन ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या सोन्याची चालू बाजारभावानुसार अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय चांदीच्या वस्तू आणि सुमारे ८ हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
“हातात कोयता घेऊन चोरटे रस्त्यावरून; सीसीटीव्हीत धक्कादायक दृश्य”
दोन चोरटे परिसरातून रस्त्यावरून एकाच्या हातात धारदार कोयता घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ही केवळ घरफोडीची घटना नसून चोरट्यांकडे धारदार शस्त्र असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना चोरट्यांचा माग काढण्यास महत्त्वाचा धागा मिळण्याची शक्यता आहे. चोरट्यांनी चोरीपूर्वी परिसराची पाहणी केली होती का? घराची माहिती त्यांना आधीपासून होती का? चोरीसाठी आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा तपास होणे गरजेचे आहे.
उरुळी कांचन परिसरात गेले काही महिन्यात झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण असताना पांगारे वस्तीमध्ये मध्यरात्री घडलेल्या या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी निर्जन भागात पोलिसांची गस्त वाढविणे, संशयास्पद व्यक्ती व वाहनांची तपासणी करणे तसेच परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चोरट्यांचा बंदोबस्त कधी?
हातात धारदार कोयता घेऊन फिरणारे चोरटे सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाले असताना, पोलिस या फुटेजच्या आधारे चोरट्यांना किती लवकर जेरबंद करतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करून चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवावा आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पांगारे वस्तीतील नागरिकांकडून होत आहे.
“घरात चोरी, हातात कोयता आणि रस्त्यावर सीसीटीव्हीमध्ये चोरटे… उरुळी कांचनमध्ये नागरिकांनी सुरक्षित कसे राहायचे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.























