उरुळी कांचनमध्ये वारंवार वीज खंडित; व्यापारी, शेतकरी व नागरिक हैराण
उद्योगधंदे ठप्प, शेतपंप बंद; एमएससीबीच्या कारभारावर नागरिकांचा संताप
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सततच्या होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून संताप व्यक्त करत आहेत. दिवसभरात केवळ काही तासच वीजपुरवठा होत असल्याने उर्वरित वेळ अंधारात काढावा लागत आहे.
स्थानिक कारखानदार सचिन कांचन यांनी सांगितले की, वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. मशीनरी व उपकरणे बंद पडण्याच्या मार्गावर असून कामगारांना काम असतानाही बसुन पगार द्यावा लागत आहे. शनिवारी तर अर्ध्या तासाला वीज ये-जा होत असल्याने कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. व्यापारी वर्गाने प्रश्न उपस्थित केला आहे की, आम्ही वेळेवर वीज बिल भरत असताना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा का मिळत नाही? छुप्या पद्धतीने लोडशेडिंग सुरू आहे का?असा संशयही व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शेतकरी वर्गाचीही मोठी अडचण झाली आहे. शेतकरी राजू कांचन यांनी सांगितले की, वीज येते कधी आणि जाते कधी याचा काहीच अंदाज राहत नाही. शेतपंप सुरू करण्यापूर्वीच वीज खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.
एकूणच, उरुळी कांचनमधील सततच्या वीज खंडित प्रकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी तात्काळ सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली आहे.
[व्यापारी व उद्योग क्षेत्रातूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ग्राहाकांकडून वीज बीलामधे विविध प्रकारचे सेवा शुल्क व कर आकरते माञ त्या प्रमाणात दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा पुरवताना दिसत नाही. यामुळे उद्योग, कारखानदार, हॉटेल्स, हॉस्पिटल्स तसेच नाशवंत वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तात्काळ वीज पुरवठा सक्षम व कार्यक्षम करावा.]
—विकास शिवराम जगताप, श्री शिवरत्न उद्योग समूह
[उन्हाळ्यामुळे लोड वाढला आहे, टॅप ओपन करण्यात येत आहे, आता फक्त मानस आणि दत्तवाडी येथे दोन-दोन तास अल्टरनेट पद्धतीने वीज पुरवठा करत आहोत. मध्यंतरी वारा पाऊसात तारा तुटल्या आणि पोल पडले होते, त्यावेळी कामे चालू होती.]
—महेश धाडवे- उपकार्यकारी अभियंता,उरुळी कांचन























