उड्डाणपुलाच्या कामापूर्वी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करा; अन्यथा कामाला सुरुवात करू नका : प्रदीप वसंतराव कंद
आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या उपस्थितीत पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन
✍️ विजयराव लोखंडे
वाघोली प्रतिनिधी :पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामास प्रारंभ करण्यापूर्वी पर्यायी रस्त्यांची उभारणी, वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात याव्यात. सर्व पर्यायी सुविधा उपलब्ध होईपर्यंत उड्डाणपुलाच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत सुरुवात करू नये, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांनी केली.
यासंदर्भातील लेखी निवेदन श्रीक्षेत्र तुळापूर येथे शिरूर–हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा लोचन शिवले यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात कंद यांनी नमूद केले की, पुणे–अहिल्यानगर महामार्ग हा राज्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांपैकी एक असून या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, औद्योगिक वाहने तसेच रुग्णवाहिका प्रवास करतात. अशा परिस्थितीत उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होऊन तीव्र वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वीच सक्षम वाहतूक नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
यामध्ये पर्यायी रस्त्यांची निर्मिती व दुरुस्ती करून ते पूर्णपणे वाहतुकीसाठी खुले करणे, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक उभारणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविणे, वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती करणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे, अशा मागण्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या उपस्थितीत प्रदीप कंद यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील, यासाठी काम सुरू करण्यापूर्वी सर्व पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
प्रदीप कंद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पर्यायी रस्त्यांची निर्मिती, दुरुस्ती आणि सर्व आवश्यक वाहतूक व्यवस्था पूर्ण होईपर्यंत उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करू नये. सर्व नियोजन पूर्ण झाल्यानंतरच कामाला परवानगी दिल्यास वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही.”
स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांना तातडीने आवश्यक सूचना द्याव्यात, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.























