कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘पुणे बुलेटिन न्यूज’ ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या वृत्ताची दखल घेत उरुळी कांचन ग्रामपंचायतीने दोन्ही प्रवेशद्वारांवरील साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवेशद्वारांचा परिसर आता स्वच्छ दिसू लागला आहे.
गावाच्या प्रवेशद्वारांवर कचऱ्याचे ढिग, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक तसेच वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः शाळा व रहिवासी परिसराच्या जवळ कचरा साचल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती.
‘पुणे बुलेटिन न्यूज’ने नागरिकांच्या समस्येला वाचा फोडत ‘उरुळी कांचन परिसरात कचऱ्याचे साम्राज्य’ या मथळ्याखाली बातमी प्रसारित केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने कार्यवाही करत कचरा हटविला.
ग्रामपंचायतीच्या या कार्यवाहीचे नागरिकांनी स्वागत केले असून, नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही होण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल नागरिकांनी ‘पुणे बुलेटिन न्यूज’चे आभार मानले.
दरम्यान, भविष्यात पुन्हा प्रवेशद्वारांवर कचरा साचू नये, यासाठी नागरिकांनीही कचरा उघड्यावर न टाकता ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.























