उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके वर काढले असून नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पोलिस प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोंडीचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र होते; मात्र आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून आठवड्याच्या शेवटी आणि रविवारी उरुळी कांचनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पूर्वीचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे प्रमुख चौक बंद करून पर्यायी वळण मार्ग उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र सध्या प्रशासनाचे दुर्लक्ष, वाढती वाहनसंख्या आणि बेशिस्त पार्किंगमुळे उरुळी कांचन पुन्हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले आहे.
विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. रविवारी उरुळी कांचन येथे भरत असलेल्या आठवडे बाजारामुळे परिसरातील वीस ते पंचवीस गावांतील नागरिक बाजारासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. परिणामी बाजारपेठ, नऊमोरी परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. अनेक वाहनचालक रस्त्याच्या मधोमधच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडत आहे.
सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत परिस्थिती अधिक बिकट बनते. व्यापारी वर्गालाही या कोंडीचा मोठा फटका बसत असून ग्राहकांना बाजारात पोहोचणे कठीण होत आहे. “दर रविवारीच नव्हे तर इतर दिवशीही सायंकाळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या समस्येतून नागरिकांची सुटका कधी होणार?” असा संतप्त सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी थेट महामार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर अडथळे निर्माण होऊन कोंडीत आणखी भर पडत आहे. स्थानिक नागरिकांना गावात ये-जा करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिक दत्तात्रेय महादेव कांचन यांनी सांगितले की, तुपे वस्ती कडे जाण्यासाठी “पेट्रोल पंपासमोर महामार्गावरच वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. वाहने थांबल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.”
वाहतूक शाखा आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी, आणि महामार्गावरील आणि नऊ मोरी येथे वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा उरुळी कांचनची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.



























