भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल
✍️ नितीन करडे
दौंड, प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील चौफुला येथे सुपा–केडगाव रोडवर दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या अवैध पार्किंगमुळे तसेच चौकात वाहतूक नियंत्रणाचा अभाव असल्याने रविवारी दुपारच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने भर उन्हात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
चौफुला परिसरात दोन प्रमुख चौक असून, त्या ठिकाणी वाहनचालकांकडून कुठूनही वाहने घालण्यात येत असल्याने अक्षरशः ‘कैची’ निर्माण झाली होती. पुलावर व चौकांमध्येच वाहने पार्किंग केल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली. शिरूर–मोरगाव रस्त्यावर अंदाजे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वेळ वाहनांची चाकेही हलत नसल्याने नागरिक संतप्त झाले.
वाहतूक कोंडीदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काही नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत वाहनांमधून खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
वाहतूक कोंडीत अडकलेले नागरिक अक्षय राक्षे म्हणाले,
“दोन तासांहून अधिक काळ आम्ही या ठिकाणी अडकून बसलो होतो. चौकात पोलीस नव्हते. शेवटी आम्हालाच वाहनांमधून खाली उतरून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत करावी लागली.”
“शिरूर–मोरगाव रस्त्यावरील चौफुला येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. एकही गाडी हलत नव्हती. चौकात कोणीही कुठूनही वाहने घालत असल्याने कैची तयार झाली होती. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमणे गरजेचे आहे.”
परशुराम जाधव- वाहतूक कोंडीतील त्रस्त नागरिक
दरम्यान, चौफुला परिसरात वाढती वाहतूक लक्षात घेता पुलावरील पार्किंगला बंदी घालणे, चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभी करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.























