उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात २० ते २२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात विषारी दारूचा पुरवठा उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस व प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कारवाया करत अवैध धंद्यांवर चाप बसवला होता. मात्र आता काही दिवस उलटताच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
सध्या उरुळी कांचनमध्ये गुटखा, अवैध दारू, हातभट्टी, ताडी आणि मटक्याचे धंदे पुन्हा लपून-छपून सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, हातभट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि ताडीच्या पिशव्यांचा खच दिसत असून, परिसरात पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे.
राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही उरुळी कांचनमधील काही टपऱ्या, किराणा दुकाने आणि फळविक्रीच्या आडून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. विशेष म्हणजे एमआरपी नसतानाही दोन ते तीनपट जादा दराने गुटखा विकला जात असल्याने काळाबाजार तेजीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर गुटखाबंदी आहे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उरुळी कांचन परिसरात गुटखा येतो तरी कुठून? पुरवठादार कोण आहेत? वाहतूक कशी होते? आणि यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने दारूची विक्री सुरूच असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दारूबंदी ही केवळ कागदोपत्रीच आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही भागात मटक्याचे व्यवहार आणि ताडीची विक्रीही पुन्हा लपून छपून सुरू झाले आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
विषारी दारू दुर्घटनेनंतर प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र आज पुन्हा अवैध धंदे सुरू असल्याच्या चर्चा होत असतील, तर संबंधित यंत्रणांची गस्त, माहिती यंत्रणा आणि कारवाई नेमकी किती प्रभावी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवैध गुटखा, दारू, ताडी व मटका अड्ड्यांवर तातडीने धाडसत्र राबवावे. गुटख्याच्या पुरवठा साखळीचा पर्दाफाश करून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी.
दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत. अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
“उरुळी कांचनमधील अवैध धंद्यांवर पुन्हा कठोर कारवाई होणार का? की हे सर्व केवळ चर्चेपुरतेच राहणार?
याकडे आता संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.”























