उरुळी कांचन वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चुकीच्या पावत्या, वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष ?
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका नागरिकाने वाहतूक पोलिसांकडून चुकीची पावती दिल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच फोनवरून कारवाईची धमकी दिल्याचाही आरोप संबंधित तक्रारदाराने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे–सोलापूर महामार्गावरील स्वरगंधार चौक येथे गुरुवार (दि. १४ मे) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संबंधित तक्रारदार मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करत होते. चौक ओलांडताना महामार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्यांनी काही वेळ दुभाजकावर थांबून रस्ता मोकळा झाल्यानंतर पुढे प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, वाहतूक पोलिसांनी दुभाजकाजवळून एक फोटो व मागील बाजूने दुसरा फोटो काढून दोन पावत्या दिल्या. त्यामध्ये ट्रिपल सीट प्रवासाबद्दल एक हजार रुपयांची पावती योग्य असल्याचे त्यांनी मान्य असल्याचे सांगितले. मात्र, आम्हाला पोलिसांनी हात न दाखवता त्या संदर्भात दुसरी पाचशे रुपयांची पावती चुकीच्या कारणावरून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “जी आमची चूक आहे ती पावती आम्हाला मान्य आहे , मात्र दुसरी चुकीची पावती का दिली जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलीसच जर तक्रारदाराला कारवाईची धमकी देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे ?
तसेच, पोलिस कर्मचारी सुदर्शन माने यांच्याशी मोबाईलवर झालेल्या संभाषणात “फुटेज पाहून तुझ्यावर कारवाई करू” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना चुकीच्या पावत्या दिल्या जात असतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
याबाबत बोलताना वाहतुक पोलिस कर्मचारी सुदर्शन माने म्हणाले, “आम्ही त्यांना हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते न थांबता पुढे गेले, त्यामुळे ती पावती करण्यात आली.”
दरम्यान, उरुळी कांचन परिसरातील वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरूनही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उरुळी कांचन येथील महत्त्वाच्या चार चौकांपैकी तीन चौकांमध्ये वाहतूक पोलिस नसतात, तर एका चौकात पोलिस उपस्थित असूनही वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, गुरुवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजेदरम्यान बारा ते पंधरा बुलेट आणि यामाहा दुचाकीस्वारांनी उरुळी कांचन, बोरीऐंदी फाटा, डाळिंब रोड,वळती रोड, शिंदवणे परिसरात अनेक वेळा फेऱ्या मारत फटाक्यासारखे कर्कश आवाज करणारे सायलेंसर वापरत नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला. तीन तासांहून अधिक काळ हे वाहनचालक परिसरात फेऱ्या मारत होते. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन समोरूनच त्यांनी अनेक वेळा फेऱ्या मारल्या आहेत. “अशा वाहनांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का? की वाहतूक पोलिस फक्त पावत्या करण्यापुरतेच आहेत?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
” सतत वाहतूक कोंडी व सतत अपघात होणारे तसेच भविष्यात मोठा अपघाताचा धोका असलेले चौक – १) पोलीस स्टेशन समोर चौक, २) स्वरगंधार चौक, ३) कस्तुरी चौक, ४) साखरे पेट्रोल पंप समोरील चौक “
उरुळी कांचन येथील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात परिणाम महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. या वाहतूक कोंडीमुळे अपघातास निमंत्रण भेटत आहे.
याशिवाय, पोलीस मदतनीस वॉर्डन हे पोलिसांची मोटारसायकल (सरकारी वाहन) वापरत असून वाहन अडवण्याचे काम करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. “वॉर्डनला वाहन अडवण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलीस स्टेशनकडे एक अधिकारी व पाच कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत असतानाही नागरिकांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. या सर्व प्रकरणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
























