उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला
✍️ नितीन करडे |
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बसस्टॉप समोर १७ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे साडे बारा वाजण्याच्या सुमारास इनोव्हा क्रिस्टा कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच १४- जीएस- ५८५८) क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा कार पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जात होती. उरुळी कांचन बसस्टॉपसमोर आल्यानंतर वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईट व सिग्नलच्या दोन खांबांना जोरदार धडक दिली. या धडकेत खांब तुटून रस्त्यावर कोसळले.
दरम्यान, पडलेल्या खांबांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याची बाब उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कमलेश होले यांच्या निदर्शनास आली. संभाव्य मोठा अपघात ओळखून त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत कर्मचारी विशाल डोंगरे यांना संपर्क साधून मदत मागवली.
यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. सर्वप्रथम विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले खांब बाजूला करण्यात आले. महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगाने काम पूर्ण करण्यात आले.
रस्त्यावर पडलेले विद्युत खांब आणि सुरू असलेला वीजपुरवठा यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस व ग्रामपंचायतीच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला.
या वेळी पोलीस हवालदार कमलेश होले, दिपक यादव, सचिन जगताप तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हिरा जाधव, विशाल डोंगरे, सचिन लोणारी, राहुल पाटोळे यांनी धाडस आणि जबाबदारीने काम करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























