पुणे-सोलापुर महामार्गाच्या लगत कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य ; परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी: कोरेगाव मूळ (ता. हवेली) शासन एकीकडे “स्वच्छ सुंदर गाव” या मोहिमेचा गजर करत असताना प्रत्यक्षात कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत मात्र गावाचा प्रवेशच कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पुणे–सोलापूर महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुणे–सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने जाताना कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश करताच रस्त्याच्या कडेला पसरलेले कचऱ्याचे ढिगारे नजरेत भरतात. ये-जा करणारे काही नागरिक, सोसायट्यांमधील सुशिक्षित नोकरदार, तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून उरलेले अन्न व इतर कचरा, तसेच मार्केट यार्ड येथे बाजार भाव कमी मिळालेला शेतमाल वाहनातुन येथे टाकला जात असल्याने या ठिकाणी अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना या मार्गाने जाताना नाक दाबून जावे लागत आहे. तसेच कचऱ्याच्या परिसरात मच्छर, माशा वाढल्या आहेत. याच कचऱ्यावर भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महामार्गालगत फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे कधीही वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
” विशेष म्हणजे याच परिसरात काही वर्षांपूर्वी भटक्या प्राण्यांमुळे झालेल्या बस अपघातात तब्बल १९ निष्पाप प्रवाशांचा बळी गेला होता. तसेच याच ठिकाणी एका शिवभक्तालाही जीव गमवावा लागला होता. एवढ्या गंभीर घटना घडूनही प्रशासनाने यापासून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच गरज आहे ती तातडीने या ठिकाणचा कचरा हटवून स्वच्छता राखण्याची आणि कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची; अन्यथा गावाच्या प्रवेश द्वारावरच उभे असलेले हे कचऱ्याचे साम्राज्य प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरत राहील.”
[महामार्गालगत साठणारा कचरा दिवसेंदिवस वाढत असून गावाच्या प्रवेशद्वारावरच अस्वच्छतेचे विद्रूप चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन याकडे नेमके कधी लक्ष देणार? कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार का? की “स्वच्छ सुंदर गाव” ही घोषणा फक्त कागदावरच राहणार, यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नॅशनल हायवेच्या लगत अशी परस्थिती असेल तर आतमधे काय परस्थिती असेल असा विचार न केला बरा]
-विशाल शितोळे –मा.तंटामुक्ती अध्यक्ष,कोरेगाव मूळ.
[पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला कोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिवा फार्म ते प्रयागधाम फाट्यापर्यंत अनेक दिवसापासून अनेक दिवसापासून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भटकी कुत्री वावरात, त्यामुळे दुर्गंधी पसरली असुन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.]
– प्रतीक विलास चौधरी-स्थानिक कोरेगाव मुळ
[लवकरच साठलेला कचरा उचलण्यात येईल, कचरा टाकत असलेल्या ठिकाणी लवकर सीसीटीव्ही कमेरे बसवण्यात येणार असुन कचरा टाकण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतेची घंटा गाडी प्रत्येक वार्डात फिरते. खुल्या जागेवर कचरा टाकताना आढल्यास त्यांच्यावर कारवाई करु]
-स्वाती राजगुरू, ग्रा. अधिकारी, कोरेगाव मुळ























