उरुळी कांचन परिसरात अवैध धंदे जोमात; अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे?
✍️ नितीन करडे
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन हे गाव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावन पदस्पर्शाने आणि परमपूज्य डॉ. मणिभाई देसाई यांच्या विचारसहवासाने ओळखले जाते. मात्र, अशा ऐतिहासिक व पवित्र वारसा लाभलेल्या गावात सध्या अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दारूबंदी असताना उरुळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी सर्रासपणे दारू विक्री सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्याचप्रमाणे, शासनाने गुटख्यावर बंदी घातली असतानाही गावात गुटखा सहज उपलब्ध होत असून, गुटखा पुरवठादारांमध्ये जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. याशिवाय, नशेच्या पानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, विशेष म्हणजे १२ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुले या नशेच्या विळख्यात अडकत असल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ युक्त ताडी-विक्री होत असून परिसरातील नागरिकांची अनेक वेळा वाद विवाद झाले असुन हे धंदे बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहे.
मटका-जुगार अड्ड्यांचा खुलेआम व्यापार
उरुळी कांचन परिसरात अवैध मटका व जुगार अड्डे उघडपणे सुरू असून, काही ठिकाणी हे अड्डे शाळांच्या परिसरातच कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अड्ड्यांमुळे तरुण पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिशेने ढकलली जात असून, लहान मुलांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहे.
या सर्व अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “पवित्र भूमीत अशा गैरप्रकारांचा बिमोड करण्याऐवजी प्रशासन गप्प का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, या अवैध धंद्यांना कोणाचे तरी राजकीय किंवा आर्थिक पाठबळ मिळत असल्याशिवाय इतक्या उघडपणे हा व्यवसाय सुरू राहणे शक्य नाही. “आर्थिक हितसंबंध, दबाव किंवा संगनमतामुळेच कारवाई होत नाही का?” असा संशय व्यक्त केला जात आहे.
या अवैध धंद्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. वेळेत प्रशासनाने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा पालकवर्ग देत आहे.
नागरिकांकडून कठोर कारवाईची जोरदार मागणी
धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उरुळी कांचन गावाच्या पवित्रतेला कलंक लावणारे दारू, गुटखा, मटका व जुगाराचे अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.























