पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा
✍️नितीन करडे
उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात विरुद्ध दिशेने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून, हा महामार्ग अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनत चालला आहे. रविवार (ता.१७ मे) रोजी सकाळ आठ वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरूनच विरुद्ध दिशेने हायवा ट्रक धावत होता. तर अशी अनेक वाहने दररोज विरुध्द दिशेने धावत आहे.
काही दिवसांपूर्वीच राँग साईडने आलेल्या टेम्पोच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र या भीषण घटनेनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. उलट, दररोज पहाटेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत तसेच सायंकाळी हलकी तसेच अवजड वाहने सर्रास विरुद्ध दिशेने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, अनेक वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी नियम धाब्यावर बसवत राँग साईडने प्रवास करत आहेत. विशेषतः टेम्पो, हायवा ट्रक, चारचाकी वाहने आणि मालवाहू वाहनांचे चालक बेफामपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांसोबत थेट धडक होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वीस दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या टेम्पोने एका वृद्धाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही ठोस उपाय योजना प्रशासनाने केली नसल्याने सतत विरुद्ध दिशेने वाहतूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित गस्त नसल्याने राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते, महामार्गावरील चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, उरुळी कांचन परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, “आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.























