उरुळी देवाचीतील शेतात गोवंश कत्तलीचा आरोप; फुरसुंगी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा
✍️ नितीन करडे
पुणे : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील मंतरवाडी परिसरातील एका शेतात गोवंश कत्तल केल्याचा आरोप समोर आल्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षण कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईदरम्यान जिवंत अवस्थेतील काही गोवंश ताब्यात घेऊन सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून घटनास्थळावरून गोमांस व इतर अवशेष जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याप्रकरणी महादेवनगर, उरुळी कांचन येथील गोरक्षक व गोरक्षा संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय राजेंद्र कांचण (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते गोरक्षणाचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार, शुक्रवार (दि. १९ जून) रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मानद पशुकल्याण अधिकारी ऋषिकेश कामठे यांनी उरुळी देवाची येथील मंतरवाडी परिसरातील एका शेतात गोवंशाची कत्तल होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर अक्षय कांचन यांच्यासह गोरक्षक कार्यकर्ते फुरसुंगी पोलिस ठाण्यात दाखल झाले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
मंतरवाडी चौकाजवळील स्मशानभूमी परिसरातील किरण बनकर यांच्या शेतात पोलिस व गोरक्षक पोहोचले असता संशयितांना चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पलायन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनास्थळी एका देशी गायीची कत्तल झाल्याचे तसेच परिसरात आतडी, काळीज व कापलेले पाय पडलेले असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोन देशी गायी, दोन जर्सी गायी, दोन जर्सी वासरे, एक बैल आणि बाहेर झाडाला बांधलेली एक जर्सी गाय अशी एकूण जनावरे आढळून आली. ही जनावरे कत्तलीसाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून जनावरे व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला गोवंश सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरंदर तालुक्यातील झेडेवाडी येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेत ठेवण्यात आला आहे. तसेच घटनास्थळावरील मांसाचे नमुने पशुवैद्यकीय तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणी किरण बनकर, सागर बनकर (रा. मंतरवाडी, उरुळी देवाची), अजिम पठाण, ख्वाजा हुसेन कुरेशी, रेहाण कुरेशी, सादिक कुरेशी (रा. कोंढवा) तसेच मैनुद्दीन कुरेशी (रा. खडकी, पुणे) यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३२५ व ३(५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(अ), ९(अ) व ९(ब) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी आढळून आलेल्या पत्र्याच्या शेडचे गोरक्षकांनी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याचे गोरक्षा संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय कांचन यांनी सांगितले. तसेच कत्तल झालेल्या गाईसाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणातील पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहे.

























