उरुळी कांचनमध्ये सतत होणाऱ्या वीज खंडितला व्यापारी वर्ग ञस्त ; व्यापारी वर्गाचा महावितरण वर आक्रमक मोर्चा
✍️(नितीन करडे)
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व्यापारी, उद्योजक आणि नागरिक हैराण झाले असून अखेर संतप्त व्यापारी वर्गाने थेट महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. निवेदन देण्यात आले. “साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सतत वीज खंडित होऊ नये यासाठी तातडीने बंदोबस्त करा,” अशी आर्त मागणी करत निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये फर्निचर कारखानदार, वर्कशॉप चालक, पीठ गिरणी धारक तसेच वीजेवर अवलंबून असलेले विविध व्यवसायिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत व्यापाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्यांचा व्यवसाय अक्षरशः ठप्प होत आहे. दिवसाला लाखोंचे नुकसान होत असुन व्यवसाय स्थलांतराच्या उंबरठ्यावर आले आहेत. मोर्चादरम्यान व्यापाऱ्यांनी महावितरणकडे ठाम मागणी केली की, “वीज कधी जाणार आणि कधी येणार याचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे. अनियमित आणि अचानक होणारा पुरवठा आम्हाला परवडणारा नाही.”
[“एका दुकानदाराकडे दोन कामगार असतील तर रोज किमान दोन हजार रुपयांचा फटका बसतो. अशा शंभरहून अधिक दुकानदारांचा विचार केला तर रोज लाखोंचे नुकसान होत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे कामगारांना काम आहे पण वीज नाही त्यामुळे बसून पगार द्यावा लागत आहे. तसेच सतत वीज खंडित होत असल्याने परिस्थिती अशी झाली आहे की, अनेक जण आपला व्यवसाय बाहेरगावी हलवण्याचा विचार करत आहेत.” दिवसात १० ते १२ वेळा वीज खंडित होत आहे. त्यामुळे व्यापारी, शेतकरी, नागरिकही हैराण झाले आहे.]
—सचिन तुकाराम कांचन- कारखानदार, उरुळी कांचन
[स्थानिक नागरिक सचिन मोरे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले, “काल तर दिवसात १० ते १२ वेळा लाईट गेली. आम्ही वेळेत बिल भरतो, मग दर्जेदार वीज का मिळत नाही? अचानक वीज गेल्यामुळे लिफ्टमध्ये लोक अडकून पडतात, घरगुती आणि व्यावसायिक कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण होतात.” शेतकरी आणि नागरिकांनाही मोठा फटका बसत असुन मोठे नुकसान होत आहे. सततच्या वीज खंडिततेमुळे केवळ व्यापारीच नव्हे तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांनाही गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने पिकांवर परिणाम होत आहे.]
— सचिन मोरे, स्थानिक शेतकरी, उरुळी कांचन
[उरुळी कांचनमधील ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वीज पुरवठ्याच्या या सततच्या अडचणींमुळे उरुळी कांचनचा औद्योगिक आणि व्यावसायिक विकास धोक्यात आला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समस्या सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.]
—अतुल मोरे, स्थानिक नागरिक

























