आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रविवारी भरलेल्या आठवडे बाजारात हरवलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला उरुळी कांचन पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढत तिची सुखरूपपणे आई-वडिलांशी भेट घडवून आणली. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. 14 जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान नेहा महेंद्र चौधरी (वय 2 वर्षे) ही चिमुकली उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात एकटीच रडत फिरत असल्याचे एका बाजार घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या निदर्शनास आले. मुलगी हरवलेली असल्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित महिलेने तत्काळ तिला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.
मुलगी अतिशय लहान असल्याने तिला स्वतःचे नाव किंवा पत्ता सांगता येत नव्हता. हरवलेल्या मुलीची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तसेच आठवडे बाजार परिसरात मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला.
पोलिसांच्या अथक प्रयत्नांना अवघ्या अर्ध्या तासात यश आले आणि मुलीच्या आई-वडिलांचा शोध लागला. त्यानंतर चिमुकलीला सुखरूपपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीची सुरक्षित सुटका झाल्याने आई-वडिलांनी उरुळी कांचन पोलिसांचे मनापासून आभार मानले.
ही उल्लेखनीय कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश जाधव, दत्तात्रय गाडेकर आणि पोलीस शिपाई सारिका गवारे यांनी पार पाडली. त्यांच्या तत्परतेमुळे चिमुकलीची सुरक्षितपणे कुटुंबाशी पुनर्भेट झाली.






















