अपुऱ्या उपाययोजनांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच !
उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर पुन्हा कंटेनर डिव्हायडरवर; चौकातील सुरक्षाव्यवस्था अपुरी
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस स्टेशनसमोर मंगळवार ता. ७ ऑक्टोंबर रोजी रात्री पुन्हा एकदा अपघात घडला आहे. हा अपघात राञी पावने बारा वाजण्याच्या दरम्यान अचानक आडवा आलेल्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनरचा वेगावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर तोडून वर चढून अपघात घडला असल्याचे कंटेनर चालक अंकुश सानप याने सांगितले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी महामार्गावरील अपुऱ्या सुरक्षायोजनांकडे पुन्हा एकदा बोट दाखवले गेले आहे.
याच ठिकाणी केवळ दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजीच पहाटेच्या वेळी
तेलाने भरलेल्या टँकरने तीन वाहनांना ठोकर देत थेट एका दुकानात घुसून मोठे नुकसान केले होते. तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याची स्थानिकांची तीव्र नाराजी आहे.
अपघात फक्त नवीन चौक बनवल्या ठिकाणीच का होतात ?
स्थानिक नागरिकांच्या मते, उरुळी कांचन येथील नव्याने बनवण्यात आलेल्या कस्तुरी चौक आणि पोलीस स्टेशनसमोरील चौक परिसरात चौक दर्शविणारे फलक, सिग्नल किंवा ब्लींकर दिवे बसवले गेलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना चौकाचा अंदाज येत नाही आणि वाहने सुसाट वेगाने धावतात.
या चौकात गेल्या काही महिन्यात अनेक अपघात घडले असून, तत्काळ वाहतूक नियोजन, फलक आणि ब्लींकर बसवावेत अशी नागरिकांची मागणी होत आहे. स्थानिक प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
[त्याबाबत ठेकेदार यांचे काम चालू आहे पण जलद काम करण्याची व सपूर्ण काम करण्याची आवश्यकता आहे. नवीन चौक बनवल्यापासून महामार्ग प्राधिकरण कडे उपाय योजनेबाबत पोलीस स्टेशन च्या वतीने पत्रव्यवहार करून अनेक वेळा सांगितले आहे. या नवीन चौकामध्ये ब्लींकर दिवे व फलक गरजेचे आहेत.]
: शंकर पाटील- पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस स्टेशन























