उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या नऊमोरी पुलाखालून गावात या—दोन्ही प्रवेशद्वारांवर नागरिकांचे स्वागत होत आहे ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी, दुर्गंधीने आणि धुराच्या साम्राज्याने! परमपूज्य महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेले उरुळी कांचन गावाची ओळख असलेली ही अवस्था प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
” कचरा, दुर्गंधीमुळे रोगराईला निमंत्रण ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, कचऱ्याच्या विळख्यातून मुक्ती कधी? नागरिकांचा सवाल! “
रेल्वेच्या नऊमोरी पुलाखालून गावात प्रवेश करताना पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचरा उघड्यावर टाकला जात आहे. विशेष म्हणजे, कचरा टाकला जातो त्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांकडून कचराकुंडीत कचरा न टाकता आजूबाजूला उघड्यावरच कचऱ्याचे ढीग केले जात आहेत. या ठिकाणी टाकण्यात आलेला कचरा अनेकदा पेटवून दिला जात असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. दुर्गंधी, धूर आणि अस्वच्छतेमुळे पादचारी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नऊमोरी परिसरातील कचरा –
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, कॅमेरे बसवूनही उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने, “कॅमेरे केवळ नावालाच आहेत का? कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
“कचऱ्याच्या संदर्भात अनेक वेळा ग्रामपंचायतीला कल्पना देऊन अर्ज देखील केले आहेत. पण शाळेच्या परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. सतत कचरा टाकला जात असल्याने परिसरातील रहिवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असुन प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ”
— विपुल घोडके, स्थानिक नागरिक, उरुळी कांचन
” परमपूज्य महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मणिभाई देसाई यांनी गावाच्या विकासासाठी आणि समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले असल्याचे गावातील जाणकार सांगतात, मात्र आज त्याच गावाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग, त्यामुळे दुर्गंधी आणि धुराचे लोट दिसत असतील, तर ही बाब गावाच्या लौकिकाला निश्चितच काळिमा फासणारी आहे. गावाच्या प्रवेशद्वाराची स्वच्छता राखणे ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कचरा टाकणारे स्थानिक नसून सुशिक्षित,भाडेतत्त्वावर राहणारे आहेत”
–राजू कांचन, स्थानिक नागरिक, उरुळी कांचन
उघड्यावर कचरा टाकत असलेली ठिकाणे, –(महामार्गावरील दोन्ही पुल, डाळिंब चौक गणपती मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन कडे जाणाता बी जी शिर्के शाळेच्या मागील बाजूचा रस्ता , रेल्वे नऊमोरी पुल परिसर, शिंदवणे रोड कॅनल पुल परिसर, दत्तवाडी रोड घुले बिल्डिंग समोरील परिसर, आश्रम रोड गोसावी वस्ती चौक, सायरस पूनावाला शाळेच्या समोर अशा ठिकाणी सतत उघड्यावर कचरा टाकला जोतो.)


























