पुणे ग्रामीण मुख्यालयाची उरुळी कांचनमध्ये धडक कारवाई! मटका व अवैध दारू अड्ड्यांवर छापा; ११ जण ताब्यात, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुख्यालयाच्या पथकाने केली कारवाई; अवैध धंद्यांना नेमका कोणाचा वरदहस्त? नागरिकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात अवैध धंदे पुन्हा एकदा बोकाळल्याचे समोर आले असून, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सायंकाळी बाजार मैदान परिसरात मटका आणि अवैध देशी दारू विक्रीवर धडक छापा टाकत ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्या, मटका साहित्य व इतर सामग्री असा सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचनमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाला मिळाली होती. त्यानंतर विशेष नियोजन करून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाजार मैदान परिसरात अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत मटका आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी (मुख्यालय) भूषण दत्तात्रय माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी गौरव गुंजेंगावकर, बाळासाहेब कारंडे, अक्षय देवकाते, रिनेश माहुरे आणि यश देसाई यांच्या पथकाने केली.
या कारवाईनंतर मात्र स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण मुख्यालयाचे पथक उरुळी कांचनमध्ये यावे लागत असेल, तर स्थानिक पोलीस नेमके काय करत होते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गावात उघडपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती स्थानिक यंत्रणेला नव्हती का?, की त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले?, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
“उरुळी कांचन परिसरातील अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे? चौकशी होणार का?”
गेले काही महिन्यांपूर्वी उरुळी कांचन परिसरातून पुरवठा झालेल्या हातभट्टी दारूच्या प्रकरणात पुणे शहरातील निष्पाप २२ जणांचा मृत्यू झाल्याची बाब तपासात समोर आली होती. त्यावेळी पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी कडक भुमिका बजावत दौंड व उरुळी कांचन येथील चार पोलीस निलंबित केले होते. तसेच दौंड, उरुळी कांचन येथील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत आळा घातला होता. मात्र कालांतराने पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे या ताज्या कारवाईतून स्पष्ट होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या कारवाईनंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे आला आहे. ही धडक मोहीम फक्त एकदिवसीय ठरणार का, की अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई केली जाणार? छापा संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होणार नाही ना, अशीही शंका नागरिक व्यक्त करत आहेत. उरुळी कांचन परिसरातील मटका, तसेच लपून छपून विक्री होत असलेली अवैध दारू, गुटखा तसेच राज्य महामार्गावरुन होणारी अवजड वाहतूक आणि इतर बेकायदेशीर धंद्यांना नेमके पाठबळ कोणाचे मिळत आहे, याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे उरुळी कांचनमधील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सातत्यपूर्ण आणि प्रभावी मोहीम राबवावी, तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
……….
























