उरुळी कांचनमध्ये बुलेटस्वारांचा धुडगूस; पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास
पुणे–सोलापूर महामार्गावर सायलेन्सर बदललेल्या बुलेटची दहशत; विना नंबरच्या वाहनांवर कारवाईची मागणी; वारकरी कर्कश आवाजाचा ञस्त
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी :जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन परिसरात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे–सोलापूर महामार्गावर काही बुलेटस्वारांनी अक्षरशः धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. डाळिंब चौक ते खेडेकर मळा परिसरात सायलेन्सर बदललेल्या बुलेटच्या कर्णकर्कश आवाजामुळे वारकरी, नागरिक आणि वाहनचालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.
पालखी सोहळ्याच्या पुढे अनेक दिंड्या महामार्गावरून मार्गक्रमण करत असताना तीन ते चार बुलेटस्वारांनी विना नंबरच्या गाड्यांवरून भरधाव वेगाने अनेक फेऱ्या मारल्या. सायलेन्सरमध्ये बदल करून मुद्दाम मोठा आवाज काढत या बुलेटस्वारांनी वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात व्यत्यय निर्माण केला.
सकाळी सुमारे अकरा वाजल्यापासून या बुलेटस्वारांचा त्रास सुरू होता. ट्रिपल सीट बसून, विना नंबरच्या बुलेटवरून बेफाम वेगाने फेरफटका मारणाऱ्या या तरुणांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्यांना अक्षरशः कान बंद करण्याची वेळ आली.
“पालखी सोहळ्यात हजारो वारकरी भक्तिभावाने चालत असताना काही बुलेटस्वार मोठा आवाज करत वारंवार जवळून जात होते. या आवाजामुळे मोठा त्रास झाला. अशा वाहनांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया वारकरी तुकाराम जगताप यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पालखी सोहळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या, विना नंबरच्या आणि सायलेन्सर बदललेल्या वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी व नागरिकांकडून होत आहे.























