जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर उरुळी कांचन येथील शेतकरी कुटुंबातील कन्या अँड. रेणुका मीरा गोविंदराव कांचन यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रेणुका या गोविंदराव किसन कांचन आणि मीरा गोविंदराव कांचन यांच्या कन्या आहेत. अत्यंत साध्या, कष्टकरी शेतकरी कुटुंबात त्यांचे संगोपन झाले. आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर मात करत त्यांनी शिक्षणाची वाट चिकाटीने चालत एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून आपल्या मेहनतीची चमक दाखवून दिली.
“ग्रामीण भागातील कन्येची उल्लेखनीय कामगिरी; रेणुका कांचन बनल्या कुटुंबातील पहिल्या वकील”
त्यांनी पुणे विद्यापीठांतर्गत श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या लॉ कॉलेजमधून विधी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणादरम्यान अभ्यासासोबत विविध कायदेविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विशेष म्हणजे, संपूर्ण नातेवाईकांमध्ये वकील होणाऱ्या त्या पहिल्या युवती ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या यशाचा कुटुंबीयांना विशेष अभिमान वाटत असून ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या यशातून मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल विजयसिंह चोरघे यांच्यासह उरुळी कांचन परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
रेणुका कांचन यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबीयांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन यांना दिले. भविष्यात न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करून समाजासाठी योगदान देण्याचा त्यांचा निर्धार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संघर्षमय आणि यशस्वी प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.























