नायगाव गोळीबार प्रकरणातील फरार दोन आरोपी अखेर उरुळी कांचन पोलिसांच्या जाळ्यात
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : अग्नीशस्त्राने थरार माजवत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अखेर उरुळी कांचन पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. तब्बल काही दिवस फरार असलेले दोन मुख्य आरोपी पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेत मोठी कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नायगाव (ता. हवेली) येथील कबीर चायनिज हॉटेलमध्ये ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडलेल्या या थरारक घटनेत फिर्यादी मिलिंद बाप्पू शेलार यांच्यावर थेट गावठी पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला होता. पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने आरोपीने जवळ येत अचानक फायरींग केल्याने हॉटेल परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर पोलिसांनी प्रथम आरोपी नवनाथ घुले याला अटक करण्यात आली, तसेच संग्राम हरीशचंद्र हूलगे, वय २० वर्षे, रा. महात्मा गांधी रोड, उरूळी कांचन ता.हवेली पुणे व सिध्दार्थ गोविंद कांबळे, वय २८ वर्षे, रा. कोरेगाव मुळ ता.हवेली पुणे हे दोघे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. तर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संग्राम हूलगे आणि सिद्धार्थ कांबळे हे दोघे मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. गुन्ह्यानंतर फरार झालेल्या या दोघांना पोलिसांनी नाशिक येथून अखेर जेरबंद केले.
या कारवाईत दोन गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली असून, आरोपी आणि फिर्यादी यांच्यातील जुना जमिनीचा वाद या हल्ल्यामागचे कारण असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड उपविभागीय अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे, मीरा मटाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हवा. योगेश नागरगोजे, राजु मोमिन, भारत मोहोळ, सचिन जगताप, प्रविण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, अजित काळे, पो.कॉ. सुमित वाघ, सोमनाथ सुपेकर, उरुळी कांचन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी पार पाडली. तसेच गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे.
दरम्यान, अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून, या गुन्ह्याचा अधिक खोलवर तपास सुरू आहे. उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांना थारा नाही, हे पुन्हा एकदा पोलिसांनी सिद्ध करून दाखवले आहे.























