पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण
✍️ प्रतिनिधी | नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात पुन्हा एकदा करणी-भानामती व जादूटोण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच दिवसात दुसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गावात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असतानाच अशा घटनांमुळे समाजात भीती आणि संभ्रम पसरत असल्याचे चित्र आहे.
मंगळवार (ता. २०) रोजी सकाळी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड येथील गणेश हनुमंत कांचन यांच्या राहत्या घराच्या दरवाज्यासमोर संशयास्पद साहित्य आढळून आले. घरासमोर टाकलेल्या प्लास्टिक पिशवीत दोन काळ्या रंगाच्या बाहुल्या, त्यातील एका बाहुलीला खिळे मारलेले, तसेच अर्धवट चिरलेली सहा लिंबे पिशवीत व तीन लिंबांमध्ये खिळे मारलेले साहित्य बाहेर पडलेल्या अवस्थेत आढळले. या साहित्यावर विविध रंग लावलेले असल्याने हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. सकाळी सुमारे आठ वाजता गणेश कांचन हे कचरा टाकण्यासाठी घरा बाहेर आले असता त्यांच्या निदर्शनास हे धक्कादायक दृश्य आले. घरासमोरच खिळे मारलेली लिंबे व काळ्या बाहुल्या पाहून घरातील लहान मुलगा व महिलांमध्ये घबराट पसरली. “अचानक असे साहित्य पाहून आम्ही घाबरून गेलो. कोणीतरी मुद्दामहून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी प्रतिक्रिया गणेश कांचन यांनी दिली.
विशेष म्हणजे, पाच दिवसांपूर्वी गुरुवारी (ता. १५) रोजी सकाळी उरुळी कांचन ग्रामपंचायत सचिवालयाच्या समोर एका दुकानाच्या बाहेर असाच करणी-जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला होता. सलग दोन घटना घडल्याने हा केवळ योगायोग नसून कोणीतरी ठरवून परिसरात अंधश्रद्धा पसरवत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीसोबत संतापही व्यक्त होत आहे. “हे प्रकार अंधश्रद्धा पसरवून मानसिक दडपण आणण्यासाठी असू शकतात,” असे मत काही ग्रामस्थांनी मांडले आहे. गावात पुन्हा असे प्रकार डोके वर काढू लागल्याने दुकानदार, महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. नक्की हे प्रकार कोण आणि कशासाठी करत आहे, याबाबत गावात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासन व सामाजिक संस्थांकडून प्रयत्न सुरू असतानाच, अशा घटनांमुळे आजही समाजात अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी, तसेच समाजात जागृती मोहीम राबवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या घटनेची माहिती अद्याप पोलिसांना देण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सलग घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही नागरिक देत आहेत. उरुळी कांचनमध्ये नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.
























