उरुळी कांचन परिसरातील डॉक्टर अपहरण प्रकरण उघड; ४८ तासांत चौघे जेरबंद, १५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त
✍️प्रतिनिधी | नितीन करडे
उरुळी कांचन परिसरात डॉक्टरचे अपहरण करून तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद करून मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून खंडणीची रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कुंजीरवाडी (ता. हवेली ) येथील डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८) हे १० जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनकडून कुंजीरवाडीकडे स्वतःच्या कारमधून जात होते. त्यांच्यासोबत चालक राजेंद्र छगन राजगुरु हा होता. इनामदार वस्ती परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या इरटीगा कारने त्यांची कार आडवी मारून थांबविण्यात आली.
इरटीगा कारमधून चार अनोळखी इसम डॉक्टरांच्या कारमध्ये शिरले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन डॉक्टरांचे अपहरण केले व त्यांना उरुळी कांचनमार्गे शिंदवणे बाजूकडे नेले. आरोपींनी डॉक्टरांना मारहाण करून ४ लाख रुपयांची खंडणी घेत चौफुला येथे सोडून दिले. मात्र, त्यानंतर आणखी १५ लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी डॉक्टरांनी १२ जानेवारी २०२६ रोजी उर्वरित रक्कम आरोपींना दिली. अशा प्रकारे आरोपींनी एकूण १९ लाख रुपयांची खंडणी उकळली. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीस स्टेशनची दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान डॉक्टरांचा चालक राजेंद्र राजगुरु याच्यावर संशय आला. व तो खरा ठरला असुन चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला.
तांत्रिक विश्लेषण व आरोपीच्या कबुलीवरून पुढील तीन साथीदारांना अटक करण्यात आली. १)राजेंद्र छगन राजगुरु (वय ३२, ड्रायव्हर) २) संतोष सोमनाथ बनकर (वय ३६), ३) दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर हे तीन आरोपी रा. अनंतपुर, सी. आर. गेट, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर ,(वय ३४), आणी ४) सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर, रा.गंगाखेड (वय ३०) आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इरटीगा कार (किंमत ८ लाख रुपये) तसेच खंडणीची रक्कम ७ लाख ८० हजार रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे करीत आहेत.























