उरुळी कांचनमध्ये समाजसेवक शंकर पाटील यांचे निधन
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील आश्रम रोड परिसरातील रहिवासी शंकर पांडुरंग पाटील (वय ५५) यांनी रविवारी (दि. १५ मार्च) सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात जीवन यात्रा संपवली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात व मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे कपिलेश्वर, ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील असलेले शंकर पाटील हे उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव म्हणून कार्यरत होते. समाजसेवेची प्रचंड आवड असलेल्या पाटील यांनी आयुष्यभर निस्वार्थीपणे समाजकार्य केले. समाजसेवा करता यावी म्हणून त्यांनी लग्नही केले नव्हते.
पशु-पक्ष्यांवर विशेष प्रेम असलेले पाटील यांचा पंचक्रोशीत मोठा मित्रपरिवार होता. साधी राहणी आणि लोकांसाठी तत्पर असणारा एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे परिसरातील सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, त्यांनी आयुष्यात शेवटची इच्छा म्हणून अवयवदान करण्याची भावना व्यक्त केली होती, अशी माहिती जवळच्या व्यक्तींनी दिली. या घटनेबाबत पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत.























