रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल त्याच्या मालकिणीला परत मिळाला. या घटनेमुळे संबंधित रिक्षाचालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरेगाव मूळ येथील गोल्डन सोसायटीमध्ये राहणाऱ्या विना प्रशांत परदेशी यांचा सॅमसंग कंपनीचा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल हरवला होता. मोबाईल हरवल्यानंतर त्यांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलीसांनी तत्काळ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित मोबाईल रिक्षामध्ये पडल्याचे निष्पन्न झाले. उरुळी कांचन येथील डाळिंब रोड परिसरात राहणारे रिक्षाचालक धनाजी अरुण काशविद यांना हा मोबाईल मिळाला होता. कोणताही मोह न बाळगता त्यांनी मोबाईल सुरक्षित ठेवून तो मूळ मालकिणीच्या स्वाधीन केला.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा जाधव, पोलीस हवालदार प्रशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत गायकवाड तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा गायकवाड यांनी समन्वय साधून मोबाईल परत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मोबाईल परत मिळाल्याने विना परदेशी यांनी रिक्षाचालक धनाजी काशविद तसेच उरुळी कांचन पोलिसांचे आभार मानले. या घटनेतून नागरिकांनी हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे परत करण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला असल्याची भावना व्यक्त होत आहे.























