पुणे प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथे दिवाळीत रस्त्यावरील फटाक्याच्या धुरामुळे व वाजत असलेल्या फटाक्याला वाचवताना दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला असुन या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. तर या अपघातातील एकजण गंभीर जखमी असून चौघांवर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड येथे सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
चक्रधर संतोष कांचन, क्षितिज राहुल जाधव (वय- 18, रा. दोघेही उरुळी कांचन), सिद्धांत नवनाथ सातव (वय- 20) व प्रतीक संतोष साठे (वय- 20) असे अपघातात जखमी झालेल्या चौघांची नावे त्यातील सिद्धांत सातव याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रम रोडवर जुन्या ठिकाणी असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर एका दुकानाचे उद्घाटन सुरू होते. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या काही नागरिक रस्तावर फटाके वाजवत होते. यावेळी चक्रधर कांचन व त्याचा मित्र क्षितिज जाधव हे दोघेजण बुलेट गाडीवरून आश्रम रोडने निघाले होते. तर सिद्धांत सातव व प्रतीक साठे हे दोघेजण इलेक्ट्रिक गाडीवरून बाजार चौकातुन एलाईट चौकाकडे काही कामानिमित्त आले होते.
आश्रम रोड ला आले असता त्या ठिकाणी काही नागरिकांनी रस्त्यावर फटाका लावला होता. त्यामुळे पूर्णपणे रस्ता हा धुरमय झाला होता. यावेळी अचानक पेटलेला फटाका दुचाकी चालकाला दिसला.
दरम्यान, पेटवलेला फटाका वाचवताना आश्रम रोडने आलेल्या दुचाकीने सोलापूर हायवे कडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सिद्धिविनायक रुग्णालयात स्थानिक नागरिकांच्या मदतीने दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. यात उरुळी कांचन पोलीस कोणावर काय कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.























