धोकादायक पुलाच्या जागी नव्या पुलाचे भूमिपूजन; परिसरातील शेतकरी, नागरिक समाधान, शिंदवणेतील काळे शिवाराला दिलासा
माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार माऊली कटके यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी-बेल्हे राज्य महामार्गावरील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार येथील जुना कालव्यावरील पूल धोकादायक बनला होता. पुलाची दुरवस्था झाल्याने तसेच येथे वारंवार अपघात घडत असल्याने नवीन पुलाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर शिंदवणे ग्रामस्थ व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अस्तित्वात असलेला पूल अरुंद आणि जीर्ण झाल्यामुळे वाहतुकीदरम्यान नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या ठिकाणी अनेक अपघातही घडले होते. त्यामुळे नवीन पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर या मागणीला मूर्त स्वरूप मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुना कालव्यावर उभारण्यात येणाऱ्या या नवीन पुलामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनचालकांची अनेक वर्षांची गैरसोय दूर होणार असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास तसेच आपत्कालीन सेवांसाठीही हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन पुलामुळे वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार असून परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमास शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके, पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, सरपंच प्रमिला शितोळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच गणेश महाडिक, माजी सरपंच सारिका महाडिक, माजी उपसरपंच संजय डोबाळे, शोभा महाडिक, ज्योती महाडिक, आनंद शितोळे, सागर खेडेकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष भुजंग महाडिक, नानासाहेब महाडिक, सदस्य सचिन शिंदे तसेच दत्तात्रय गाडेकर, संभाजी महाडिक, दत्तात्रय महाडिक, संग्राम महाडिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर न्याय मिळाल्याने शिंदवणे, उरुळी कांचन व परिसरातील गावांमधील संपर्क अधिक मजबूत होणार असून विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच पुलाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.























