उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!
पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे शुक्रवारी (ता. २४ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीने हजारो वाहनचालकांचा संयम सुटला. सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर उरुळी कांचन येथे एका बसचा टायर अचानक पंचर झाल्याने महामार्ग अक्षरशः ठप्प झाला. अवघ्या एका निकामी बसमुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना तब्बल दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
या कोंडीत रुग्णवाहिका, मालवाहू ट्रक, खासगी बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनेही अडकून पडली. कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांचे महत्त्वाचे व्यवहार खोळंबले, तर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचीही माहिती समोर आली.
विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी सुरू होऊन जवळपास पाऊण तास उलटल्यानंतरही वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त वाहनचालकांनी, “वाहतूक पोलीस होते तरी कुठे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. वेळेत वाहतूक नियंत्रण केले असते, तर एवढी मोठी कोंडी टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
उरुळी कांचन हे पुणे–सोलापूर महामार्गावरील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून, किरकोळ बिघाड झाला तरी संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडते. मात्र अशा घटनांसाठी कोणतीही तातडीची यंत्रणा कार्यरत नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियोजन, तत्काळ क्रेनची व्यवस्था आणि २४ तास वाहतूक पोलिसांची उपस्थिती सुनिश्चित करावी. अन्यथा अशा कोंड्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत राहणार आहे.























