कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन, प्रतिनिधी : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवे बळ देणाऱ्या कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून या महत्त्वाकांक्षी विकासकामाला मंजुरी मिळाली असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
“उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महत्त्वाचे पाऊल”
कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, तरळे, वळती आणि परिसरातील अनेक गावांसाठी हा मार्ग दैनंदिन प्रवासाचा प्रमुख दुवा मानला जातो. मात्र, जुन्या पुलामुळे तसेच वाहतुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीची कोंडी, अपघातांचा धोका आणि प्रवाशांना होणारा त्रास ही गंभीर समस्या बनली होती. या पार्श्वभूमीवर नवीन कॅनॉल पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे कृषी मालाची वाहतूक सुलभ होण्यासह परिसरातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासालाही चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांशी अधिक चांगली संपर्क व्यवस्था उपलब्ध होऊन विकासाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप (नाना) वाल्हेकर, विविध मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी, तरळे आणि वळती परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या हस्ते
यावेळी बोलताना आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके म्हणाले, “मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्यामुळे या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पूल पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होईल. तसेच या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल.”
भूमिपूजन सोहळ्यानिमित्त उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शासन, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आमदार माऊली आबा कटके यांचे आभार मानले. या पुलामुळे परिसरातील वाहतुकीच्या समस्या दूर होऊन विकासाला गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
























