धक्कादायक घटना! “निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?”
पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा सापळा; उरुळी कांचन परिसरात दोन भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
✍️नितीन करडे |
उरुळी कांचन प्रतिनिधी :पुणे–सोलापूर महामार्गावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसून उरुळी कांचन परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित अपघाताचा साक्षीदार ठरला आहे. सोमवार ता. ८ मार्च. रोजी मध्यरात्री उरुळी कांचन येथे सुरू असलेल्या काळभैरवनाथाच्या याञेवरून परतणाऱ्या एका व्यक्तीचा महामार्ग ओलांडताना भरधाव बल्करच्या धडकेत चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सोमवार ता. ९ रोजी आणखी एका व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम बबन भंडारे (वय ५३ वर्ष, रा. शिंदवणे रोड, उरुळी कांचन, मूळगाव नाशिक) हे उरुळी कांचन येथे सुरू असलेल्या याञेला गेले होते. याञेवरून घरी परतत असताना त्यांनी पुणे–सोलापूर महामार्गावरील शिंदवणे चौक येथे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी सोलापूरहून पुण्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या बल्कर (क्र. MH-12 SX 8985) ने त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बल्करचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि त्यांचा कुटुंबीयांसमोरच जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन जगताप व प्रवीण चौधर घटनास्थळी दाखल झाले. अपघात करून फरार झालेल्या बल्करचा पाठलाग करून चालक प्रणव प्रदीप शिंदे (वय २०) याला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सोमवार (९ मार्च) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चौधरी माथा, उरुळी कांचन येथे आणखी एक अपघात घडला. सोमनाल रजाक (वय ३० वर्ष, रा. उरुळी कांचन) हे महामार्ग ओलांडताना मारुती सुझुकी एर्टिगा (क्र. MH 42 BF 7643) या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच समाजसेवक किरण भंडारी मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीस बाजूला काढून पुढील कार्यवाहीस मदत केली.
“आठवडाभरात चौथा बळी”
“धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठ दिवसांत उरुळी कांचन परिसरात अपघातात चार जणांचा बळी गेला आहे.”
सोरतापवाडी हद्दीत एका पुरुषाचा मृत्यू, चंदनवाडी फाटा येथे ७० वर्षीय महिलेचा मृत्यू आणि आता शिंदवणे चौकातील एकाचा मृत्यू, तर चौधरी माथा येथे ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, असे आठ दिवसात चार जणांचा बळी पुणे सोलापूर महामार्ग उरुळी कांचन परिसरात गेले आहेत.
– या घटनांमुळे पुणे–सोलापूर महामार्ग पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांचाही जीव धोक्यात-
शाळा सुटण्याच्या वेळेस शिंदवणे चौक आणि ए-लाईट चौक येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. महामार्ग ओलांडताना वाहनांचा प्रचंड वेग असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नेमले असतानाही अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले पोलीस नेमके करतात तरी काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उरुळी कांचन परिसरातील खालील चौक अपघातांचे हॉटस्पॉट ठरत आहेत – स्वरगंधार समोरील चौक, पोलीस स्टेशन समोरील चौक, प्रयागधाम चौक,
सहजपुर फाटा ते नायगाव फाटा (सुमारे ७ किमी पट्टा) धोकादायक याच परिसरात सतत अपघात
या परिसरात अनेकांचे जीव गेले असून अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी?
उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्याच ठिकाणी सतत अपघात होत असल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी खालील उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे – महामार्गावरील धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस तैनात करणे, सिग्नल व्यवस्था सुरू करणे, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, स्पष्ट दर्शक फलक बसवणे, सुरक्षित पादचारी मार्ग / झेब्रा क्रॉसिंग – पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसर अपघातांचा केंद्रबिंदू बनत चालला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करेल, असा सवाल आता संतप्त नागरिक विचारत आहेत.























