उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू
✍️नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गेले तीन दिवसांपासून काळभैरवनाथाचा उरूस सुरू होता. या उरुसासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पुणे–सोलापूर महामार्ग ओलांडताना भरधाव बलकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ८ मार्च) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम बबन भंडारे (वय ५३ वर्ष) रा. शिंदवणे चौक उरुळी कांचन, हे आणि त्यांची मुलगी व लहान मुलगा असे तीघे जण उरुळी कांचन येथील उरुसात आले होते. उरूस आटोपल्यानंतर ते राञी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घरी परत जात असताना पुणे–सोलापूर महामार्गावरील शिंदवणे चौक येथे रस्ता ओलांडत असताना त्यांनी पहिला रस्ता ओलांडला व दुसरा रस्ता ओलांडताना सोलापुर वरुन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बलकरने पुढे चालत असलेले उत्तम भंडारे यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा कुटुंबासमोरच जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पो हवा पोलीस प्रवीण चौधर, सचिन जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व अपघात करून पळून जाणाऱ्या बलकरचा पाठलाग करून पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चालक प्रणव प्रदीप शिंदे (वय २० वर्षे) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.























