सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा दाखल
✍️नितीन करडे
उरुळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर सावकारी व अवाजवी व्याजवसुलीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळामुळे एका तरुण व्यावसायिकाने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महादेव विठ्ठल जरांडे (वय ३६, व्यवसाय – जुने चारचाकी वाहन खरेदी-विक्री, रा. उरुळी कांचन परिसर) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, आरोपी आनंता पवार व माऊली पवार यांनी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या रकमा दिल्या. मात्र, त्यावर दरमहा ८ ते १० टक्के इतक्या अवाजवी व्याजदराने वसुली करण्यात आली.
“सावकारी प्रकरणात मारहाण व बंदुकीचा धाक; ३ गुंठे जमीन बळकावल्याचा आरोप”
फिर्यादीनुसार तक्रारदाराकडून ५३ लाख ८९ हजार रुपये मुद्दल घेतल्यानंतरही आरोपींनी अवघ्या ११ महिन्यांत ६० लाख ४१ हजार रुपये व्याज वसूल केल्याचा आरोप आहे. तसेच, व्याज न दिल्यास दबाव टाकत विक्रीसाठी ठेवलेल्या १२ जुन्या चारचाकी गाड्या ओढून नेण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये आरोपींनी तक्रारदारास मारहाण करून जबरदस्तीने कुंजीरवाडी येथे नेले. तेथे बंदुकीचा धाक दाखवून, कोरेगाव मूळ येथील ३ गुंठे जमीन साठेखत व कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राद्वारे आरोपींच्या नातेवाईकाच्या नावावर करून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या व्यवहारात कोणताही धनादेश प्रत्यक्षात देण्यात आलेला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सततच्या छळामुळे तक्रारदाराने २६ जानेवारी २०२६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याचा प्रकार घडला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, शुद्धीत असताना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी (आनंता पवार, माऊली पवार, रा. हडपसर), (दिपाली साळुंखे रा. कुंजीरवाडी) व (विजय पांडुरंग गोते रा. उरुळी कांचन) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी तक्रारदाराने २९ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. त्याच अनुषंगाने उरुळी कांचन पोलिसांकडे चौकशीसाठी अर्ज आला होता. “वेळीच कारवाई झाली असती तर माझ्या पतीने विष प्राशन केले नसते,” अशी प्रतिक्रिया तक्रारदाराच्या पत्नीने व्यक्त केली आहे.
[उरुळी कांचन परिसरातील बेकायदेशीर सावकारकी प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. संबंधित दोषी आरोपींवर कायद्याप्रमाणे कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी बेकायदेशीर सावकारांच्या जाळ्यात अडकू नये, तसेच परिसरात सावकारकीविषयी काही प्रकार घडत असल्यास तात्काळ दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.]
– बापूराव दडस
उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग























