गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक
उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रविवारच्या आठवडी बाजारात गणपती मंडळाच्या वर्गणीवरून एका दुकानदाराला कथितरित्या शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गणपती वर्गणीच्या नावाखाली ठराविक रक्कम देण्यासाठी दबाव आणणे, त्यास नकार दिल्यानंतर अरेरावी व अपशब्द वापरणे, तसेच “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस” अशा शब्दांत सुनावल्याचा आरोप संबंधित दुकानदाराने केला आहे.
रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचनच्या आठवडी बाजारात हा प्रकार घडल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे. बाजारात विविध प्रकारचे छोटे-मोठे दुकानदार व्यवसायासाठी येतात. याच दरम्यान एका गणपती मंडळातील काही व्यक्ती वर्गणी गोळा करण्यासाठी आल्या. संबंधित दुकानदाराकडे ३०० रुपये वर्गणीची मागणी करण्यात आल्याचे त्याने सांगितले.
मात्र, “इतर दुकानदारांकडून १५० ते २०० रुपये वर्गणी घेतली जात असताना माझ्या छोट्या दुकानाकडून ३०० रुपये का?” असा सवाल करत दुकानदाराने स्वतःहून २०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. “देवाच्या नावाने मी खुशीने २०० रुपये देत आहे; मात्र बळजबरी करू नका,” असे सांगितल्यानंतरही संबंधित व्यक्तीने कथितरित्या दुकानदाराला शिवीगाळ केली.
दुकानदाराच्या आरोपानुसार, संबंधित व्यक्तीने “तू आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, तुला एवढेच पैसे द्यावे लागतील” अशा शब्दांत अपमानास्पद भाषा वापरली. विशेष म्हणजे, २०० रुपये वर्गणी घेतल्यानंतर त्याची पावतीही देण्यात आली नसल्याचे दुकानदाराने सांगितले आहे.
वर्गणी की दादागिरी?
गणपती उत्सवासाठी नागरिक व व्यापारी स्वेच्छेने वर्गणी देतात. मात्र, वर्गणीच्या नावाखाली ठराविक रक्कम देण्यासाठी दबाव आणणे आणि नकार दिल्यास शिवीगाळ करणे योग्य आहे का? असा थेट सवाल आता आठवडी बाजारातील दुकानदारांकडून उपस्थित केला जात आहे.
गणपती उत्सव हा श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा उत्सव आहे. त्यामुळे वर्गणीच्या नावाखाली कोणत्याही दुकानदाराला अपमानित किंवा दबावाखाली आणले जात असेल, तर त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
या प्रकाराबाबत संबंधित दुकानदाराने केलेल्या आरोपांची उरुळी कांचन पोलिस प्रशासन चौकशी करणार का? कथित शिवीगाळ व दबाव आणणाऱ्यांवर कारवाई होणार का? वर्गणी वसुलीची पद्धत तपासली जाणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“गणपतीच्या नावाखाली वर्गणी मागणे चुकीचे नाही; मात्र वर्गणीसाठी दादागिरी आणि शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही,” अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली असून, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी होत आहे.























