१६० ग्रामदूतांच्या सहभागातून ६ टन कचऱ्याची विल्हेवाट; ‘विठ्ठल बन’ येथे सलग नवव्या वर्षी विशेष स्वच्छता सेवा अभियान
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठल बन, डाळींब (ता. दौंड) येथे आषाढी यात्रा व बारस महाप्रसादानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांच्या पार्श्वभूमीवर ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या नेतृत्वाखाली सलग नवव्या वर्षी विशेष स्वच्छता सेवा अभियान उत्साहात पार पडले. या अभियानात १६० ग्रामदूतांनी सहभागी होत अवघ्या अडीच तासांत सुमारे ६ टन कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.
सोमवारी (दि.२७ जुलै) सकाळी ६ ते ८.३० या वेळेत राबविण्यात आलेल्या या अभियानात स्वयंसेवकांनी भक्तिभावाने स्वच्छता सेवा बजावत विठ्ठल बन परिसर चकाचक केला. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला कचरा तातडीने हटविल्यामुळे भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध झाले.
या उपक्रमात ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह ग्रुप, डाळींब ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, उरुळी कांचन ग्रामपंचायत, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट, डाळींब ग्रामपंचायत तसेच डाळींब गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी कचरा संकलनासाठी आवश्यक वाहनांची उपलब्धता करून देत अभियानास मोलाचे सहकार्य केले.
सर्व संस्था, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे केवळ स्वच्छताच नव्हे, तर पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि लोकसहभागाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला. सलग नऊ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेले हे अभियान परिसरातील लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
“आजची ही स्वच्छता सेवा श्री विठ्ठल चरणी अर्पण” या भावनेतून पार पडलेल्या या उपक्रमाने सेवाभाव, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणला. स्वच्छतेची जनजागृती आणि लोकसहभागातून परिवर्तन घडविणाऱ्या या अभियानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

























