जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
✍️ नितीन करडे
पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम आणि आनंदवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर-महंमदवाडी परिसरातील आनंदवन फेज-५ (औतडवाडी-हांडेवाडी) व न्याती काउंटी येथे भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे ७०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि शेकडो निसर्गप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र वन विभागाचे फॉरेस्ट कॉन्झर्व्हेटर आशिष ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी झपाट्याने वाढणारे शहरीकरण, जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा मोहिमांमध्ये लोकसहभाग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी सांगितले की, वाढते तापमान, तीव्र होत चाललेली उष्णतेची लाट आणि दुर्मिळ होत जाणाऱ्या वनौषधींचे संवर्धन या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. केवळ वृक्षारोपण करून न थांबता पुढील तीन वर्षे या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही संस्थेने केला आहे.
कार्यक्रमादरम्यान आनंदवन संस्थेचे विशाल पवार यांनी संस्थेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. तसेच, युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या डॉ. सोनल भालेराव यांनी संस्था गेल्या तीन वर्षांपासून कळसुबाई परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्य करत असल्याचे सांगितले. समाजहितासाठी राबविण्यात येणारा हा लोकसहभागातून साकारलेला पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी आनंदवन संस्थेचे प्रवीण कुमार आनंद, रमेश नऱ्यानी, भूपेश शर्मा तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे डॉ. समीर ननावरे, डॉ. पुस्तके, डॉ. पाटील, डॉ. वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. इंडियन डायस्पोरा आणि झेंटिव्हा संस्थेच्या प्रतिनिधींसह दिल्ली पब्लिक स्कूल, अमानोरा स्कूल, रेहान स्कूल, डीपीएस स्कूल आणि ग्रेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
याशिवाय नोबेल हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी डॉ. संजय पठारे, हेल्थ केअर असोसिएशनचे धनंजय कणसे, सिद्धू चव्हाण, हृषीकेश शेळके, डॉ. भूषण केदारी, अडसूळ, संघर्ष अकॅडमी (उरुळी कांचन), वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी झाले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






















