गुटखा बंदी असतानाही गुटखा येतो तरी कुठून? २० रुपयांची विमल ५० रुपयांना; काही ठिकाणी छुप्या तर काही ठिकाणी खुलेआम विक्री सुरूच…. पोलीस प्रशासन मात्र अनभिज्ञ!
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही पूर्व हवेली परिसरात गुटख्याचा काळाबाजार पुन्हा एकदा तेजीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर विविध ठिकाणी कारवाया सुरू असताना यवत, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, लोणी काळभोरसह परिसरातील अनेक भागांमध्ये गुटखा छुप्या पद्धतीने तर काही ठिकाणी खुलेआम विक्री होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे “गुटखा बंदी असूनही हा माल नेमका येतो तरी कुठून?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पूर्वी २० रुपयांना मिळणारी विमल गुटख्याची पुडी सध्या तब्बल ५० रुपयांना विकली जात असल्याचे समोर येत आहे. बंदी आणि कारवाईच्या भीतीमुळे पुरवठा कमी झाल्याचा फायदा घेत काही विक्रेते वाढीव दर आकारत असल्याची चर्चा आहे. ओळखीच्या ग्राहकांना गुप्तपणे गुटखा उपलब्ध करून दिला जात असून, त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, किरकोळ विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गुटखा पोहोचत असल्याने या मागे एखादी संघटित साखळी कार्यरत आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. किरकोळ दुकानदारांकडे माल येतो तरी कुठून, याचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. काही ठिकाणी ग्राहकांना थेट गुटखा देण्याऐवजी सांकेतिक पद्धतीने व्यवहार केले जात असल्याचेही बोलले जात आहे.
गुटखा विक्रीवर बंदी असतानाही हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुटखा खाणारे नागरिक खुलेआम गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंगताना दिसुन येत आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात वाढीव किमतीत गुटख्याची विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारवाई केवळ साठेबाजांपुरती मर्यादित राहत आहे का, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
संबंधित प्रशासनाने मोहीम राबवून गुटखा पुरवठ्याची साखळी उघड करणे गरजेचे आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसून, मूळ पुरवठादार आणि साठेबाजांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
“राज्यात गुटखा बंदी आहे, मग २० रुपयांची पुडी ५० रुपयांना विकली जात असताना हा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचतो तरी कुठून? गुटखा बंदी केवळ कागदावरच आहे का?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.























