उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती
✍️ नितीन करडे |
उरुळी कांचन, प्रतिनिधी : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उरुळी कांचन येथे शनिवार (ता. 25 एप्रिल) रोजी ‘जागतिक हिवताप दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन अंतर्गत उपकेंद्र उरुळी कांचन व पांढरस्थळ यांच्या वतीने प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये हिवताप व डेंग्यूसंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली.
प्रभात फेरीची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय उरुळी कांचन येथून झाली. बाजार मैदान, एम. जी. रोड, सोलापूर रोड, आश्रम रोड, जय मल्हार रोड अशा प्रमुख मार्गांवरून ही फेरी काढण्यात आली. फेरीदरम्यान आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचाऱ्यांनी “गप्पी मासे पाळा, हिवताप-डेंग्यू टाळा”, “आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा” अशा प्रभावी घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
बाजार परिसर, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. काही दुकानदारांनी प्रभात फेरीचे व्हिडिओ चित्रण केले, तर शालेय विद्यार्थ्यांनी हातात बॅनर व पोस्टर घेऊन संदेश वाचन करत जनजागृतीत सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर नाशिककर यांनी केले. तसेच जिल्हा अधिकारी अपर्णा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश गोरे, संकपाळ व महेश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात आरोग्य सहायक दीपक राऊत, प्र. वैद्यकीय अधिकारी करुणा अमृतकर, आरोग्य सेवक गणेश सहारे, गणेश फाळके, राहुल दाभाडे, प्रतीक जगताप, सौरभ कळसाईत, संजय गाढवे, गट प्रवर्तक संगीता धर्माधिकारी यांच्यासह सुमारे २५ आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हिवताप व डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि नियमित प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश या प्रभात फेरीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

























