उरुळी कांचन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पेठ खून प्रकरणातील दोघे जेरबंद
वैयक्तिक रागातून संगनमताने केली हत्या; सोलापूरातून दोन आरोपी अटकेत
✍️नितिन करडे
उरुळी कांचन : पेठ (ता. हवेली) येथील चर्चित खून प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी जलद कारवाई करत दोन आरोपींना सोलापुरातून अटक केली आहे. वैयक्तिक वादातून संगनमताने हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. अटक केलेले आरोपी स्वप्निल शिवाजी चौधरी व आदेश रेवलनाथ चौधरी असे आहेत.
घटनेत (ता. १८ डिसेंबर) रोजी संध्याकाळी ७.३० ते १९ डिसेंबर दुपारी १ वाजेच्या दरम्यान पेठ गावातील थेऊर–पेठ रोडलगत, म्हसोबा मंदिराजवळील शेतात संपत तुकाराम चौधरी (वय ४८, रा. वडाचीवाडी पेठ) यांचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. या प्रकरणी मृताचे पुत्र यश संपत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.
प्रकरणाचा तपास वेगाने करण्यासाठी उरुळी कांचन पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन स्वतंत्र तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज, कॉल रिकॉर्ड व गुप्त माहितीच्या आधारे संशय आरोपी मध्यप्रदेशातील उज्जैन व सोलापूर येथे असल्याचे समोर आले. अखेर पथकाने २९ डिसेंबर रोजी सोलापुरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
तपासात उघड झाले की, मयत व आरोपी स्वप्निल चौधरी यांच्यात यापूर्वी वैयक्तिक वाद व गुन्हे दाखल होते. त्याच रागातून आरोपींनी संगनमताने खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.
हि कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक (बारामती) गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी (दौंड) बापुराव दडस यांच्या सूचनांनुसार पार पडली. तर पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक सचिन वांगडे (उरुळी कांचन पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहेत.
























