उरुळी कांचनमध्ये सायलेन्सर काढून दहशत! कर्कश आवाजात भरधाव फेऱ्या; नागरिक त्रस्त
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सायलेन्सर काढलेल्या मोटरसायकलींचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या शांततेला तडा जात आहे. सोमवार (दि. १५ जून) रोजी सकाळी सुमारे सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान बगाडे वस्ती रोड परिसरात हिरो होंडा कंपनीची सीडी डॉन मोटरसायकल सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत भरधाव वेगाने वारंवार फेऱ्या मारत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच हीच मोटारसायकल रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान बाजारपेठ रोडनी चकरा मारत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरसायकलवर दोन तरुण बसले होते. त्यांनी मुद्दाम सायलेन्सरचा मोठा आवाज काढत परिसरात अनेक चकरा मारल्या. या प्रकारामुळे रस्त्यावरील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून हीच मोटरसायकल उरुळी कांचन परिसरात कर्कश आवाज करत फिरत असून भरधाव वेगामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण होत आहे. वाहनचालकांच्या या बेफिकीर वर्तनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरात वाढत चाललेल्या अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
“तुपे वस्ती रोड परिसरात अनेक दिवसांपासून काही युवक बुलेट, यामाहा, स्प्लेंडर तसेच इतर दुचाकींचे सायलेन्सर बदलून किंवा काढून मोठा कर्कश आवाज करत भरधाव वेगाने फेऱ्या मारत आहेत. दिवसभर तसेच सायंकाळच्या वेळेत या वाहनांचा त्रास अधिक जाणवतो. या आवाजामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे शांतता भंग होत आहे. संबंधित वाहनचालकांवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करून नागरिकांना या त्रासातून दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे.”
– विपुल घोडके, स्थानिक नागरिक, उरुळी कांचन.























