उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात
नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी
✍️नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, उरुळी कांचन परिसरात बेकायदा दारू विक्री अद्यापही सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. संबंधित विषारी दारूचा पुरवठा उरुळी कांचन परिसरातून झाल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे वृत्त असतानाही स्थानिक पातळीवर अवैध दारू विक्रीवर प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
विषारी दारू प्रकरणात उरुळी कांचन व यवत पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी दोन अशा एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. या कारवाईनंतरही परिसरातील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद झालेला नसल्याची चर्चा सुरू आहे.
दारूबंदी असलेल्या उरुळी कांचनमध्ये काही ठिकाणी खुलेआम तर काही ठिकाणी अत्यंत गुप्त पद्धतीने दारूची विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळी लवकरपासून रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मद्यविक्री सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. असून, काही हॉटेल्स व इतर ठिकाणी बाहेरून कुलूप लावून आतमध्ये मद्यसेवनासाठी व्यवस्था केल्याचेही चिञ दिसत आहे.
काही विक्रेते दारूबंदीचा गैरफायदा घेत पाण्याच्या बाटल्यांमध्ये अथवा इतर स्वरूपात हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची चर्चा आहे. एका ठिकाणी व्यवसाय बंद असल्याचे भासवण्यासाठी बाहेरून गेटला कुलूप लावले जात असले, तरी ग्राहकांना अन्य मार्गाने प्रवेश देऊन मद्यविक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अशा व्यवसायांना कोणाचे संरक्षण आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
” विषारी दारू प्रकरणातील संपूर्ण साखळीचा तपास अद्याप पूर्णपणे समोर आलेला नसल्याची चर्चा असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग किंवा संपर्क होता, याचा सखोल तपास होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच उरुळी कांचन आणि यवत पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद होणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.”
परिसरात ताडी व इतर मद्यजन्य पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा असून, या प्रकारामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत जात असल्याची चिंता पालक व्यक्त करत आहेत. दारूबंदी असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री सुरू असल्यास संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
उरुळी कांचन येथे दारूबंदी आहे. विषारी दारूकांडात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे बेकायदा दारू विक्री, ताडी विक्री व मद्य तस्करीच्या संपूर्ण साखळीवर कठोर कारवाई करून हा अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलिसांकडून वेळोवेळी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येत असली, तरी अवैध दारू व अमली पदार्थयुक्त ताडी विक्री सुरूच असल्याचा आरोप होत आहे. या अवैध धंद्यांवर वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात पुन्हा एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.






















