यवत (ता. दौंड) येथील महामार्गावरील जाऊजीबाची वाडी येथून उरुळी कांचन पर्यंत रस्त्यावर पडले मातीसारखे पावडरीय ढीग, वाहनचालकांना त्रास, अपघाताची भीती वाढली
✍️ नितीन करडे |
पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर यवत (ता. दौंड) जवळील जाऊजीबाची वाडी येथून उरुळी कांचन (ता. हवेली) पर्यंतच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीसारखी पावडर स्वरूपातील सामग्री पडलेली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहन या ठिकाणीून जाताच ती पावडर हवेत उडत असून, रस्त्यावर दाट धुळीचा पडदा तयार होत आहे.
संबंधित विभागाकडून तात्काळ कारवाईची गरज!
महामार्गावरील हा धुळीचा कहर प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत असून, प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
नागरिकांच्या मते, ही पावडर हायवा (डंपर) मधून पडल्याची शक्यता असून, पडल्यावर ती काढण्याची कोणतीही तातडीची कारवाई झालेली नाही. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे वाहनाच्या पुढील भागाचा अंदाज लागत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अत्यंत दाट आहे. विशेषतः दुचाकी वाहनचालकांना डोळ्यात धूळ जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रस्त्याचे दृश्य न दिसणे यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाहनचालकांची प्रतिक्रिया :
> “चारचाकी चालवतानाच एवढी धूळ उडते की समोरचं वाहन दिसत नाही. मोटरसायकल चालवणाऱ्यांना तर धुळीचा मोठा सामना करावा लागतोय. या धुळीमुळे कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गावर असे अनेक ठिकाणी मातीचे ढीग पडले आहेत ”
— प्रशांत कड, वाहन चालक























