जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उरुळी कांचन-सोरतापवाडी गणातून इच्छुक उमेदवार अनिल कदम यांचा सायकलवरून प्रचार प्रारंभ
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन-सोरतापवाडी गणातून इच्छुक उमेदवार अनिल रामु कदम यांनी आपल्या प्रचाराला एक आगळावेगळा प्रारंभ दिला आहे. (दि. ३१ ऑक्टोंबर) शुक्रवार रोजी सायंकाळी उरुळी कांचन येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरमधे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास, संत श्री सेना महाराज, भगवान गौतम बुद्ध, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, छत्रपती संभाजी महाराज, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद या महापुरुषांच्या प्रतीमेचे पूजन करून, अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडत अनिल कदम यांनी सायकल यात्रेच्या माध्यमातून प्रचार मोहिमेची सुरुवात केली.
या वेळी परिसरात ताशांच्या गजरात, जयघोषात, आणि मोठ्या उत्साहात कदम यांनी सायकलवरून प्रचाराला प्रारंभ केला. विशेष म्हणजे, ओंकार कांचन पाटील व मित्र परिवाराने अनिल कदम यांना सायकल भेट दिली, ज्यावरून ते प्रत्यक्ष गावागावांत, वस्तीवस्तीत, मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट देणार आहेत.
या शुभारंभ प्रसंगी अनेक स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरणात उत्साह आणि एकात्मतेची भावना दिसून आली. या सायकल प्रचार मोहिमेमुळे अनिल कदम यांनी आपल्या गणातील मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यांच्या या अनोख्या प्रचारपद्धतीची परिसरात चर्चा रंगली आहे.
अनिल कदम यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की —
“मी माझ्या गणातील प्रत्येक मायबाप मतदार, बंधू-भगिनींना सायकलवरून भेट देणार आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहे. जनतेशी थेट संवाद साधून विकासाचे नवीन पर्व सुरू करण्याचा माझा निर्धार आहे.”
























