कोरेगाव मूळमध्ये वाढत्या केबल चोरीने शेतकरी चिंतेत
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : कोरेगाव मूळ (ता. हवेली) परिसरात शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणाऱ्या केबल चोरीच्या घटना पुन्हा समोर आल्या आहेत. नदी पात्रात शेतपंपांना जोडलेल्या कॉपर केबलची चोरी होण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडत असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गुरुवार (दि. ८ एप्रिल) रोजी सकाळी सुमारे ११ वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतकरी शेतपंप सुरू करण्यासाठी गेले असता पंप चालू न झाल्याने त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतपंपांच्या कॉपर केबल चोरीला गेल्याचे उघड झाले. या घटनेत अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
” कोरेगाव मूळ येथे शेतकऱ्यांच्या शेतपंपांच्या केबल चोरीच्या घटना वाढल्या; शेतकरी चिंतेत “
या चोरीच्या प्रकारात रामभाऊ यादव, बबन कोलते, गणेश शितोळे, गणेश कड, अर्जुन कड, योगेश पवार, सचिन सरडे, ताठे आदी शेतकऱ्यांच्या शेतपंपांच्या केबल चोरीला गेल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ही चोरी झाली असून, एकूण आठ ते दहा शेतकरी बाधित झाले असल्याचे सांगितले.
“अशा प्रकारच्या चोरीच्या घटना दर चार ते सहा महिन्यांनी घडत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे होत असून शेतीचे नियोजन बिघडते.”
– गणेश कड – शेतकरी, कोरेगाव मूळ
“अगोदरच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि आता केबल चोरीमुळे आम्ही पूर्णपणे अडचणीत सापडलो आहोत.” सततच्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
– गणेश शितोळे -शेतकरी, कोरेगाव मूळ























