उरुळी कांचन येथे राञीच्या वेळेस अवजड वाहनांची विरुद्ध दिशेने वाहतूक : समोरासमोर मोठा अपघात होण्याची शक्यता
✍️ नितीन करडे
पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करून तयार करण्यात आलेल्या नवीन चौकातुन रात्री दोन ते पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान अवजड वाहने काही अंतर वाचवण्यासाठी स्वर गंधार चौकातुन शिंदवणे चौकाकडे वळण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावरुनच उलट्या दिशेने वेगाने राञीच्या वेळी वाहने धावत आहेत. त्यामुळे समोरासमोर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
या बेफिकीर वाहनचालकांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठा प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याचा फायदा घेत अनेक अवजड वाहने नियम धाब्यावर बसवत आहेत. वाहतूक पोलिस व प्रशासनाने तातडीने गस्त वाढवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, उलट दिशेने अवजड वाहनांची ही धोकादायक सवय त्वरित थांबवली नाही तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
” थोडे अंतर वाचवण्यासाठी वाहनांनी विरुद्ध दिशेने जाऊ नये. थोड्या अंतरावरच वळण आहे. वाहनांनी त्या वळणाचा वापर करावा, जर उलट दिशेने वाहने आढळ्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.”
: शंकर मनोहर पाटील – पोलीस निरिक्षक,उरुळी कांचन पोलीस स्टेशन























